Pages

Monday, December 2, 2013

आपल्या मातृभाषेत शिक्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आहे !

लॉर्ड मॅकालेने म्हटले होते : ’
मी येथील शिक्षण-पध्दतीत असे काही संस्कार टाकून जात आहे की येणार्‍या काही वर्षात भारतवासी आपल्याच संस्कृतीची घृणा करू लागतील....मंदीरात जाणे पसंत करणार नाहीत.... आई-वडीलांना नमस्कार करण्यात त्यांना स्वत:ला अपमान वाटेल...ते शरीराने तर भारतीय असतील पण मन बुध्दीने आमचेच गुलाम असतील....’
आपल्या शिक्षण-पध्दतीत मॅकालेने टाकलेल्या संस्कारांचा प्रभाव आज स्पष्टपणे दिसून येत आहे. आजचे विध्यार्थी शिकून-सवरून पदवी घेऊन बेरोजगार होऊन नोकर बनण्यासाठी भटकत राहतात.
 महात्मा गांधींच्या शब्दांत : "कोट्यावधी लोकांना इंग्रजी शिक्षण देणे हे त्यांना गुलामीत टाकण्यासारखे आहे.मॅकालेने शिक्षणाचा जो पाया रोवला, तो खरोखरच गुलामीचा पाया होता. ही काय कमी अन्यायाची गोष्ट आहे की आपल्या देशात जर मला न्याय हवा असेल तर मला इंग्रजी भाषा वापरावी लागेल ! भारताला गुलाम बनविणारे तर आपण इंग्रजी जाणणारे लोक आहोत. प्रजेचा तळतळाट इंग्रजांना नव्हे तर आपल्यालाच लागेल." इंग्रजीचा आपल्या जीवनावर किती दुष्प्रभाव पडतो, याविषयी गांधीजींनी म्हटले आहे :
"विदेशी भाषेतून शिक्षण घेताना जे ओझे डोक्यावर पडते ते असह्य आहे. हे ओझे केवळ आपली मुलेच उचलू शकतात परंतू त्याची किंमत त्यांनाच चुकवावी लागते. ती दुसरे ओझे उचलण्याच्या लायकीची राहत नाहीत. यामुळे आपले पदवीधर बहुतांशी कामचुकार, अशक्त, निरुत्साही, रुग्ण आणि कोरे नक्कलबाज बनतात, त्यांच्यातील संशोधन शक्ती, विचार करण्याची शक्ती, साहस, धैर्य, शौर्य, निर्भयता इ. गुण खूपच क्षीण होतात. यामुळे आपण नव्या योजना आखू शकत नाही. काही, आखल्यातरी त्या पूर्ण करू शकत नाही.
काही लोकांमध्ये वरील गुण दिसून येतात, ते अकाल मृत्यूला बळी पडतात.”
 गांधीजी पुढे म्हणतात : "आईच्या दुधासोबत जे संस्कार मिळतात आणि जे गोड शब्द ऐकू येतात, त्यांच्यात आणि शालेय शिक्षणात जो सुमेळ असला पाहीजे, तो विदेशी भाषेतून शिक्षण घेतल्याने तुटून जातो. आपण अशा शिक्षणास बळी पडून मातृद्रोह करतो."

रविंद्रनाथ टागोरांनीही मातृभाषेचा अत्यंत आदर केला. त्यांनी म्हटले होते : "आपल्या मातृभाषेत शि़क्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आहे. मातृभाषेत शिक्षण द्यावे की नाही अशा प्रकारची चर्चा होणेच निरर्थक आहे." त्यांची मान्यता होती की 'ज्याप्रकारे आपण आईच्या कुशीत जन्म घेतला आहे, त्याचप्रकारे मातृभाषेच्या कुशीत जन्म घेतला आहे. या दोन्ही माता आपल्यासाठी सजीव आणि अत्यावश्यक आहेत.

गांधीजींनी मातृभाषा-प्रेम व्यक्त करताना म्हटले की "माझ्या मातृभाषेत कितीही चुका का असेना, मी त्या मातृभाषेला अगदी तसाच कवटाळून राहीन, जसे मूल आईच्या छातीशी कवटाळून राहते. तीच मला जीवनदायी दूध देऊ शकते. मी इंग्रजीला तिच्या जागी प्रेम करतो परंतु इंग्रजी माझ्या मातृभाषेचे स्थान हिरावून घेऊ पाहते ज्याची ती हक्कदार नाही. यामुळे मी इंग्रजीचा आवर्जून तिरस्कार करेन. मी या भाषेला केवळ बोलीभाषेच्या रूपात स्थान देईन परंतु विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात, शाळांमध्ये नाही. ती काही लोकांच्या शिकण्याची बाब असू शकते, लाखो-करोडोंची नव्हे !

रशियाने इंग्रजीशिवायही विज्ञानात इतकी प्रगती केलेली आहे. आज आपल्या मानसिक गुलामगिरीमुळेच आपण हे मानू लागलो आहोत की इंग्रजीविना आपले काम होणार नाही. मी या गोष्टीशी जराही सहमत नाही." विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण देणे हे मानसशास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टिकोणातून अत्यावश्यक आहे. कारण शाळेत आल्यावर मुले जेंव्हा आपली भाषा व्यवहारात आलेली पहातात तेंव्हा ते शाळेप्रती आत्मीयतेचा अनुभव करू लागतात. त्याचबरोबर त्यांना सर्वकाही जर त्यांच्याच भाषेत शिकविले तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी समजणे अगदी सोपे होते.

भारतेंदू हरिश्चंद्र यांनीही 'निज भाषा' म्हणून मातृभाषेचे महत्व व प्रेम आपल्या खालील सुप्रसिध्द दोंह्यांच्या रुपात व्यक्त केले आहे : निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल I बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल II उन्नति पूरी है तबहिं, जब घर उन्नति होय I निज शरीर उन्नति किये, रहत मूढ सब कोय II

रवींद्रनाथ टागोरांनी जपानचा दृष्टांत देताना सांगितले की "या देशाची जितकी प्रगती झाली आहे, ती त्यांच्या जपानी भाषेमुळेच झाली आहे. जपानने आपल्या भाषेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि इंग्रजीच्या प्रभुत्वापासून जपानी भाषेला दूर ठेवले." जपानी लोक यासाठी धन्यवादास पात्र आहेत कारण जेव्हां ते अमेरिकेत जातात तेव्हां तेथेही आपल्या मातृभाषेतच बोलतात.....आणि आपण भारतवासी !

भारतात राहत असूनही आपल्या मराठी, हिंदी, गुजराती इ. भाषांमध्ये इंग्रजी शब्दांची भेसळ करतो. गुलामगिरीच्या मानसिकतेने अशी वाईट सवय लावली आहे की तिच्याशिवाय राहवत नाही. स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षाहूनही जास्त काळ लोटला, बाह्य गुलामगिरीच्या बेड्या तर तुटल्या पण ही आंतरिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी अजूनपर्यंत गेलेली नाही. रवींद्रनाथ टागोरांनी चिंतन करताना सर्वसामन्य लोकांसाठी हा महत्वाचा विचार व्यक्त केला आहे की 'अनावश्यक गोष्टीस जितक्या प्रमाणात आपण अत्यावश्यक बनवू तितक्याच प्रमाणात आपल्या शक्तीचा र्‍हास होत जाईल. युरोपसारखे आपल्याकडे संबळ नाही. युरोपिअन लोकांसाठी जे सुलभ आहे, आपल्यासाठी तेच ओझे होते. सुगमता, सोज्ज्वळता आणि सहजता हीच खरी संस्कॄती आहे. आत्यधिक आयोजनाची जटिलता एक प्रकारचा अत्याचार आहे.' म्हणून आपल्या मातृभाषेचा महिमा ओळखा आपल्या मुलानां इंग्रजीत शिक्षण देऊन त्यांच्या विकासात अडथळा आणू नका. त्यांना आपल्या मातृभाषेत शिकण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासात सहभागी व्हा. कोणीही असे माता-पिता नसतील, जे आपल्या मुला-मुलींचे कल्याण वा प्रगतीची इच्छा करणार नाही. ते करतातच, केवळ गरज आहे तर आपली विचारधारा बदलण्याची !

इंग्रजी माध्यमाचा अट्टहास का ???

हल्ली भारतात (खास करून महाराष्ट्रात)सर्वसाधारणपणे सर्व थरातील पालकांनी आपल्या पाल्यांना पूर्व-प्राथमिक धरून सगळे शिक्षण इंग्रजीतून देण्याचा चंगच बांधलेला दिसतो. जणू काय ‘शिक्षण म्हटले की ते इंग्रजीतूनच झाले पाहिजे’ आणि ‘इंग्रजीतून शिक्षण हेच फायदेशीर आहे’ असे गृहितच धरले आहे. एकदा एखादी गोष्ट आपण गृहीत धरून चाललो की तिच्या अन्य बाजू नजरेआड केल्या जातात. इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवण्याचे तोटे जरी समोर आले तरी त्या संबंधीची चर्चा टाळली जाते किंवा भरमसाट पैसे मोजल्यामुळे हे तोटे कबूल करण्याची हिंमत नसते. ‘इंग्रजी ही जागतिक भाषा’, ‘इंग्रजीतून शिकल्यामुळे प्रगती’ अशी मानसिकता घडल्यामुळे तोटे दिसले तरी त्याची जबाबदारी न घेता उलट त्या दुष्परिणामांचे खापर बापड्या मुलांवरच फोडले जाते. ‘मुलं शिकतच नाहीत’चे पालुपद लावतात व मोकळे होतात. भंपक प्रतिष्ठेची झापडे लावलेल्या पालकांकडून शिक्षणाच्या माध्यमाचा सारासार विचार होणे नाही. परक्या भाषेतून जी भाषा शिकल्याशिवाय बोलताही येत नाही, ती परकी भाषा. अशा परक्या भाषेतून शिकताना मुलांना कशा प्रकारची कसरत करावी लागते, याचे भान पालकांना राहत नाही किंवा जाणूनबुजून ते दुर्लक्ष तरी करीत असावेत. माध्यमाच्या आकर्षणामुळे बहुसंख्य लोकांना इंग्रजी हवे आहे. लहान वयात अगदी सहजतेने मुले आठ-दहा इंग्रजी गाणी (नर्सरी र्‍हाईम्स) म्हणतात. ए-बी-सी-डी तोंडपाठ म्हणतात. ते ऐकून आई-बाबांना वाटते की, आता या मुलाला इंग्रजी माध्यमात घालायला काहीच अडचण नाही. मुले तिसरीत-चौथीत पोहोचली की लक्षात येते की, इंग्रजीमुळे आपल्या मुलाची प्रगती खुंटते आहे. शाळेतील सर्व विषय इंग्रजीतून शिकायचे असल्यामुळे त्यांचा अभ्यास कित्येकवेळा अतिशय कष्टप्रद होतो. पदरात काय पडते तर घोकंपट्टी व पोपटपंची. हे सगळे करवून घेण्यासाठी पूर्व प्राथमिकपासून ट्यूशन क्लासेस! त्यामुळे मुले कुठल्याच विषयावर स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीत. स्वतंत्र विचार म्हणजे काय हेच त्या बिचार्‍यांना माहीत झालेले नसते. त्यामुळे एकूण शिक्षणावरच मर्यादा पडतात. कधी कधी सहावीपर्यंतचा काळ जातो. पण या वयात धड ना इकडचे ना तिकडचे होऊन मुले त्रिशंकू होतात. परतीचे दोर तर केव्हाच कापलेले असतात. परक्या भाषेतून शिक्षण घेताना मुलांना सोसावा लागणारा हा सर्वांत मोठा तोटा होय. मुलांची स्थिती दयनीय होते. काही मुले वैफल्यग्रस्त होतात. बर्‍याचजणांचे लक्ष अभ्यासावरून पुरते उडालेले असते. अंगात एक प्रकारची बेफिकिरी आणि त्याच बरोबरीने अपरिहार्यपणे येणारा कोडगेपणा, यामुळे आई-वडील अत्यंत चिंताग्रस्त, संतापी आणि हतबल बनतात. त्याचबरोबर निराश किंवा बेफिकीर मुले यामुळे कुटुंबाचे स्वास्थ्य हरवून बसतात. कदाचित याच कारणासाठी मुलाला चौदा वर्षेपर्यंत शाळेच्या छप्पराखाली ठेवण्याच्या संविधानात दिलेल्या वचनपूर्तीसाठी सरकारने ‘शिक्षण हक्क कायदा’ केलेला असावा. या कायद्यानुसार विद्यार्थ्याला म्हणे आठवीपर्यंत नापास करता येत नाही. म्हणजे सहाव्या वर्षी पहिलीत आलेला विद्यार्थी वयाच्या चौदाव्या वर्षीपर्यंत ‘आठवी पास’ झालेला असेल. वयाची चौदा वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलाला शाळेच्या छप्पराखाली ठेवण्याचे संविधानातले वचन पाळल्याचे समाधान! पुण पुढे काय? ते मूल काय शिकलेय? त्याच्या ज्ञानाचा स्तर काय? ते पुढे दहावीपर्यंत-पदवी पर्यंत पोचते का? देशाला चांगले जबाबदार नागरिक मिळण्यासाठी त्यांच्याकडे सरकारने व्यवस्थित लक्ष द्यायला नको काय? एका पाहणीत असे दिसून आले आहे की, प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त १० टक्के मुले मॅट्रीकपर्यंत पोचतात आणि या दहा टक्क्यातील फक्त चार टक्के पदवीपर्यंत पोहोचतात! या मागचे कारण काय असेल? या कारणाच्या मुळाशी पोचणे म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण का आवश्यक आहे? या प्रश्‍नाच्या उत्तराकडे पोचणे आहे. याआधारे विचार करताना स्पष्ट होते की, परक्या भाषेतून निर्माण झालेला आशय प्रभावी पद्धतीने मनापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हा आशय पाठ करूनच स्मरणात ठेवण्याची सवय लागते. ‘अभ्यास म्हणजे पाठ करणे आणि परीक्षेला ओकून टाकणे’ असे समीकरण यामुळेच झालेले आहे. कोणत्याही विषयाचे परिपूर्ण आकलन होण्यासाठी स्वतःचा आशय निर्माण करणे आवश्यक आहे आणि हे मातृभाषेतूनच साध्य होऊ शकते. मुळातच काहीही सुचते ते सुचण्याची भाषा ‘मातृभाषाच’ असते. ती मुलांमधली सर्जनशीलता फुलवत नेते. परक्या भाषेतून सर्व समजून घेताना, समजलेले व्यक्त करत असताना त्यातली सहजता नष्ट झाल्याने ही प्रक्रिया यांत्रिकपणे होते आणि बालवयापासूनच म्हणजे ‘घडणीच्या’ वयापासून त्यांच्या अंगात ही यांत्रिकपणा भिनते. याउलट मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी लाभल्यावर सभोवतालच्या विविधांगी अनुभवांना सक्षमपणे भिडता येते. मेंदूतील विविध ग्रहण क्षमता आणि जाणिव समृद्ध होत जातात. यशपाल समितीच्या अहवालातील हीच गोष्ट सूचित करण्यात आली आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रुसो म्हणतात, ‘प्रौढांनी दडपण आणल्यामुळे बालकांच्या स्वतःच्या आवडीनिवडी व भावना दडपल्या जातात आणि मग त्यांच्यात कृत्रिमता व खोटेपणा निर्माण होतो.’ मुलांचा विचार ‘मूल’ म्हणून केला पाहिजे. आपण ठरविलेल्या फुटपट्‌ट्या लावून तो बंद करू नका. हे सांगणार्‍या जगभरातील शिक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यातील तथ्य संवेदनशिलतेने जाणून घेतल्यास मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व उलगडत जाते. प्रत्येक मूल हे वेगळे असते. अगदी जुळी मुलेसुद्धा. प्रत्येकाची वेगळी स्वतंत्र विचारपद्धती आणि क्षमता असते. त्यांच्या आधारे आणि स्वतःला येणार्‍या अनुभवांच्या सहाय्याने ते शिकत जाते. या सबंध प्रक्रियेत पाय रोवून उभे राहण्यासाठी मुलांना मातृभाषेतून शिक्षणाची भक्कम जमीन हवी असते. पण इंग्रजीसारख्या परक्या माध्यमात मुलांना ढकलून त्यांच्या पायाखालची ही जमीनच पालक हिरावून घेत आहेत. मातृभाषा ग्रहण करण्यात जर त्रुटी राहिली किंवा तिच्यापासून मुलांना दूर करण्याचा प्रयत्न केला किंवा करत राहिलात तर त्यांच्या भाषाविकासात अडथळे येतीलच. त्याशिवाय अन्य विषयांच्या ग्रहणातही हे अडथळे अडसर ठरतात. कोणत्याही विषयांतील संकल्पना मातृभाषेच्याच आधारे अधिकच सुस्पष्ट होतात. अन्यथा त्या पाठ करून स्मरणात ठेवाव्या लागतात आणि त्यामुळे त्या संकल्पना समजून घेण्यातला आनंद हरवतो व त्यांच्या गाठोड्याचा भार वाहणे एवढेच उरते. पुष्कळवेळा वाटचालीत ते गाठोडे हरवते वा त्यांत साठवलेल्या संकल्पनांचा विसर पडतो. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्री. कृष्णकुमार यांनी म्हटले आहे, ‘भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसते तर कल्पनाशक्तीच्या विकासाचे व विचार शक्तीच्या विकासाचे एकमात्र साधन असते.’ मातृभाषेतून शिक्षण घेण्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊन तो समाजाशी, देशाशी व संस्कृतीशी पूर्णतः जोडला जातो.

Sunday, December 1, 2013

इंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता ???

जन्माला आल्यापासून बालक शिकू लागते. आपण त्याला शिकण्यात मदत करायची असते. शाळा किंवा पुस्तकातून जे शिकवले जाते तेच शिक्षण; अशी एक ठाम समजूत आज मुलांचे प्रचंड नुकसान करते आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात पालकच पदरचे पैसे खर्चून मुलांच्या शिक्षणाची नासाडी करत असतात. पी ह्ळद आणि हो गोरी, अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रसिद्ध होती. आता ती म्हण किंवा उक्ती राहिलेली नाही. कारण आता तरुण मुलींना गोरेपणा हवा असेल, तर हळद वापरावी लागत नाही. वेगवेगळ्या कंपन्या झटपट गोरेपण देणार्‍या क्रिमच्या ट्युब बनवून बाजारात विकत असतात. मग मुलींसाठी वेगळे क्रिम असते आणि मुलांसाठी वेगळे क्रिम असते. त्याच्यासाठीच्या जाहिराती बघितल्या, मग मुलांची गोरे होण्यासाठी झुंबड उडते. तोच प्रकार मुलांना हुशार व बुद्धिमान बनवण्यासाठी पालकांच्या बाबतीत चालू आहे. कोणी जाहिरातीमधुन मुलांना दूधातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही म्हणून आपल्या डोक्यात घालते, तर कोणी कुठले टॉनिक घेऊन मुल वर्गात कशी फ़टाफ़ट उत्तरे देते हे दाखवते. मग आपण त्या डबे वा ट्युबा घेण्यासाठी दुकानात धाव घेतो. त्याच पद्धतीने नावाजलेल्या शाळा ही आता दुकाने बनली आहेत. आमिरखानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची "जनकलियाण" सहयोगी असलेली रिलायन्स फ़ाऊंडेशनही मुंबईत अशीच एक अत्यंत महागडी शाळा चालवते. तिथे शिकणार्‍या एका मुलाच्या पालकाने दिलेली रक्कमसुद्धा सत्यमेव जयतेच्या एका भागाला देणगीपेक्षा अधिकच असते. सामान्य कष्टकर्‍याला वर्षभरात जेवढे पैसे मिळवता येणार नाहीत, इतकी त्या शाळेत महिन्याची नुसती फ़ी आहे. तिथे सचिन तेंडूलकर वा शाहरुख खानची मुले शिकायला जातात. ती आपोआपच हुशार होणार हे गृहीत आहे. त्यांच्या तुलनेत कमी दर्जाच्या शेकडो शाळा व शिक्षण संस्था आज तालुक्याच्या गावातही उभ्या राहिलेल्या आहेत आणि "जनकलियाण" करत आहेत. लाखो रुपयांच्या देणग्या व हजारो रुपये फ़ी भरून प्रवेश मिळवायला पालक त्यांच्या दारात अनेक महिने आधीपासून रांगा लावत असतात. मग तिथे प्रवेश मिळाला तर भारतरत्न मिळवल्याप्रमाणे अभिमानाने त्याची मित्र परिचितांमध्ये जाहिरात सुद्धा करतात. पण खरेच अशा शाळांची गरज आहे काय? शाळा हा मुलांना हुशार व अभ्यासू बनवणारा कारखाना आहे काय? पालक इतकी प्रचंड रक्कम का खर्च करतो? याचे पहिले कारण इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हेच आहे. मी मुंबईत वास्तव्य करतो, त्या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास प्रत्येक इमारतीमधे एका खोलीत तरी शाळकरी मुलांसाठी शिकवणी वर्ग आहेत. घरबसल्या तिथे गृहीणी त्या मुलांचा अभ्यास घेतात व पालकांकडून चांगले पाचशे हजार रुपये फ़ी उकळतात. पाचसात वर्षाची ती केविलवाणी मुले पाहून मला खरेच त्यांची दया येते. एकदा अशा क्लासमध्ये शिकवणार्‍या तरुण मुलीला काय शिकवते असे विचारले. कारण ती स्वत:च तीनदा दहावीच्या परिक्षेला नापास झाल्याचे मला ठाऊक होते. ती उत्तरली, राईट-रॉंग करून घेते. मला त्याचा काहीच बोध झाला नाही. म्हणून खुप खोदून विचारले, तेव्हा उलगडा झाला. ज्या पालकांचे शिक्षण आपल्या मातृभाषेतही दहावीपर्यंत नीट झालेले नाही, अशा पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हट्टाने घातले आहे. पण तिथे जो घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क दिले जाते, त्याची पुर्तता करताना पालक मुलांना मदत करू शकत नाहीत. त्यांची सोय करण्यासाठी हे क्लास सुरू झाले आहेत. मग होते काय? तर सहा तास मुले शाळेत जातात, घरी आल्यावर कुणाच्या तरी क्लासमध्ये होमवर्क पुर्ण करण्यासाठी जातात. त्यातच थकून जातात. त्यांना विश्रांती घ्यायलाही सवड मि्ळत नाही तर खेळायला मोकळीक कशी मिळायची? आणि दिवसातले दहा बारा तास त्या मुलांना पुस्तकातले उतारे लिहून वाचून काढावे लागतात. ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला सवडच दिली जात नाही. हे प्रश्न आणि ही उत्तरे; अशी अवस्था आहे. प्रश्नही त्यांना समजलेला नसतो. मग त्याचे उत्तर समजण्याचा विषयच कुठे येतो? उत्तर शोधणे दुरची गोष्ट झाली. जे उत्तर लिहिले वा सांगितले तेच उत्तर का आहे, तेही मुलाला कळण्याची कोणाला गरज वा्टत नाही. मग शिकणार काय? प्रश्न व उत्तरे यायला हवीत, तो विषय कळण्याची गरजच उरत नाही. पण आपले मुल एबीसीडी म्हणते, बड्बडते यावरच पालक खुश असतो. शिकण्यासाठी मुलात समजावे लागते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. घोकंपट्टी म्हणजे अभ्यास म्हणजेच शिक्षण, ह्या गैरसमजाचा तो परिणाम आहे. शिकण्यासाठी समजायचे तर त्या मुलाला समजणार्‍या भाषेत व माध्यमात शिकवायला हवे. समजणारी भाषा मातृभाषाच असते. ती भाषा समजणारी असल्याने शिकणे सोपे जाते. आपण जी भाषा सातत्याने जगण्यात वापरत असतो, त्याच भाषेत आपण विचारही करत असतो. आणि शिकण्याची प्रक्रिया ही विचाराशी संबंधित आहे. मुलांची गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही स्वत:चा विचार करा. तुम्हाला कोणी तामीळ भाषेत प्रश्न केला तर काय होईल? आधी तो प्रश्न तुम्हाला आपल्या भाषेत समजून घ्यावा लागेल. मग त्याचे उत्तर तुम्ही आपल्या भाषेत तयार करणार आणि त्यानंतर त्याचे तामीळी रुपांतर त्या व्यक्तीला सांगणार ना? आपल्याला धड हिंदी बोलता येत नाही, तर आपले किती हाल होतात? मग इवल्या बालकाचे त्या कोवळ्या वयात भलत्याच भाषेत व्यवहार करण्यात किती हाल होत असतील, याची नुसती कल्पना करा. आपली हौस म्हणुन आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, तेव्हा मुलांमधल्या उपजत शिकण्याच्या प्रवृत्तीचा आपण कोंडमारा करून टाकत असतो. त्याच्या शिकण्याच्या उत्साहात अडथळे आणत असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे मुल हुशार करण्याचा सोपा मार्ग शोधल्याचा तो दुष्परिणाम आहे. अर्थात जे पालक घरातही मुलाशी इंग्रजीत बोलू शकतील, त्यांनी त्या मार्गाने जाणे उपयुक्त असेल. पण ज्या घरात इंग्रजीचा व्यवहारी वापर होत नाही, त्या घरातल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे त्याचे बौद्धिक कुपोषण करणेच आहे. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण सहासात वर्षांनी दिसू लागतात. पण तोवर मागे फ़िरण्याची वेळ टळून गेलेली असते. पहिलीपासून मुलांना इंग्रजी भाषा येण्याची काहीही गरज नसते. किंबहुना कुठलीही भाषा किंवा विषय शिकण्याची गरज नसते. चौथी म्हणजे मुलाच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत त्याला शिकण्याविषयी आस्था व गोडी लावणे, एवढाच शाळेचा हेतू असतो. शिकायचे कसे हे शिकण्याचे ते वय असते. त्यावेळी कुठलाही विषय वा भाषा मुलांना शिकवणे, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा पाया घालण्याच्या वयाची नासाडी असते. मग ते मुल एक भाषा शिकण्यात आपली क्षमता खर्च करते आणि शिकायचे कसे त्यात कमजोर राहून जाते. उलट त्या कोवळ्या वयात मुल मातृभाषेत शिकले तर त्याला विषयातला आशय आत्मसात करण्याचे कौशल्य मिळवता येते. ते मिळवले मग पुढल्या वयात अन्य विषयांप्रमाणेच त्याला इंग्रजी भाषाही सहजगत्या आत्मसात करता येते. पण कोवळ्या वयात इंग्रजीसाठी विषय आत्मसात करण्यात कमजोरी आली, मग पुढल्या वयात सर्वच विषयांचे आकलन करताना मुल कमी पडू लागते. म्हणूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून अन्य माध्यमात मुलांना शिकवणे घातक असते. पण हे कोणी कोणाला सांगायचे? मी हे अनुभवाचे बोल सांगतो आहे. आणि ते सांगताना, मी त्याचा अनुभव स्वत:च्या मुलीला मातृभाषेच्या माध्यमात शिकवून घेतला आहे. म्हणूनच मोठी दे्णगी वा फ़ी मोजून मुलांवर अफ़ाट खर्च करताना मेटाकुटीस येणार्‍या पालकांची मला दया येते. मुलांसाठी ते पैसे कमावतात, खर्चही करतात, पण बहुतांश पालक मुलाचे नुकसानही करत असतात. त्याचे एक कारण असे की सहसा पालक आपल्या मुलांना समजून घेतच नाहीत. स्वत:ला जागरुक म्हणवून घेणारा पालकही स्वत:च्या मुलाविषयी संपुर्ण अंधारात असतो. पैसा कमावण्याच्या मागे पळताना त्याला मुलाला समजून घ्यायला सवड मिळत नाही. मग तो मुलावर खर्च करून त्याची भरपाई करत असतो. पण मुल म्हणजे काय. त्याची वाढ कशी होते, त्याची बुद्धी कशी विकसित होते, मुल कसा विचार करते, मुल मोठ्यांच्या अनुकरणातून कसे शिकत असते, या प्रश्नांची उत्तरेच पालक शोधत नाहीत. किंबहूना असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत वा त्यापासून पालकांना पळ काढायचा असतो, ही आजच्या मुलांची, पालकांची व शिक्षणाची समस्या बनली आहे. त्यात मग शिक्षणाचा धंदा मांडणर्‍यांनी आपले स्वार्थ साधून घेतले आहेत. त्याच्यावर सरकारपेक्षा सामान्य पालकच उत्तम उपाय योजू शकतो. पण त्यासाठी त्याने प्रचंड पैसे खर्च करण्याची गरज नसून मुलांवर आपला वेळ खर्च करण्याचे औदार्य दाखवले पाहिजे. मुल शिकते म्हणजे तरी काय करते? या प्रश्नाचे उत्तर उद्या शोधू.

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये. कारण मातृभाषा हे हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून मुलांचा सर्वागीण विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. ज्ञाननिर्मितीसाठी इंग्रजी भाषेचा वापर होत असला तरी सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान लोकभाषेतूनच प्रभावीपणे पोचविता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मराठी भाषा व संस्कृतीसाठी काम करू इच्छिणाऱ्या आजी-माजी विद्यार्थी शिक्षकांच्या या मेळाव्याला मुंबई, ठाणे, कर्जत, पालघर परिसरातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मौलिक योगदान देणाऱ्या डॉ. दत्ता पवार आणि मिलिंद चिंदरकर यांचा डॉ. काकोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता पवार यांनी विद्यापिठीय अभ्यासक्रमात मराठी विषयाचे स्थान अबाधित राहावे म्हणून उभ्या राहिलेल्या भूतकाळातील आंदोलनांच्या यशापयशाचा आढावा यावेळी घेतला. तर महात्मा गांधी विद्या मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेचे संचालक मिलिंद चिंदरकर यांनी ‘गुरुकुल’ या मराठी माध्यमातील शाळेच्या अभिनव प्रयोगाची माहिती देत आनंददायी, अनुभवाधिष्ठित आणि मराठीतील शिक्षणातून मुलांचा सर्वागीण विकास होतो हे पालकांनी ओळखले पाहिजे हे आग्रहपूर्वक मांडले. तसेच ‘घोका आणि ओका’ यामधून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी खऱ्या ज्ञानाचा शोध घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. डॉ. अनिल काकोडकर

Saturday, November 30, 2013

राज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे


नवीन मराठी शाळांना परवानगी नाकारून आणि शासनमान्य नसलेल्या प्रयोगशील मराठी शाळांना टाळे लावण्याची धमकी देऊन महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवी वर्षांत मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना अभूतपूर्व अशी आदरांजली वाहिली आहे. मराठी शाळांबाबत पारतंत्र्याच्या काळातील ब्रिटिश सरकारलाही लाजवणारे धोरण स्वीकारून राज्य सरकारने साडेदहा कोटी महाराष्ट्रीय जनतेचा अपमान केला आहे.
मराठी शाळांवरील बंदी तात्पुरती असून बृहत् आराखडा तयार झाल्यानंतर मराठी शाळांना परवानगी देण्याचा विचार करू असा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री करीत असले तरी मुळात मागेल त्याला इंग्रजी शाळा व मराठी शाळांच्या परवानगीला स्थगिती हा आगाऊपणा झालाच कसा; हा प्रश्न उरतोच. मागे खुद्द शिक्षणमंत्र्यांनीच मराठी शाळा हे एक ओझे असल्याचे जाहीरपणे म्हटले होते. आता लोकांनाच मराठी शाळा नको आहेत तर शासन दुसरे काय करणार; असा बचावही शासनामार्फत केला जातो. लोकांची मागणी लक्षात घेऊन काही महापालिकांनी मराठी शाळांचे इंग्रजी शाळांत रूपांतर केलेलेही आपण पाहातो. हे काय चालले आहे? आणि याची परिणती कशात होणार आहे? यासाठीच महाराष्ट्र या भाषिक राज्याची स्थापना झाली का? इंग्रजी शाळांची मागणी करणारे कोण लोक आहेत? लोकांना मराठी शाळा खरेच नको असतील तर त्या का नको आहेत, याचा शासनाने कधी विचार केला आहे काय?
मराठी शाळा दोन कारणांसाठी आवश्यक आहेत. एक - मातृभाषेतून शिकण्याचा आपला अधिकार अबाधित ठेवण्यासाठी, आणि दोन - मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी.
मातृभाषेतून शिक्षण या संकल्पनेला व्यक्तिगत व सामाजिक परिमाणे आहेत. व्यक्तीच्या सर्जनशीलतेचा, तर्कबुद्धीचा जलद व स्वाभाविक विकास तिची जन्मापासून सोबत करणार्‍या मातृभाषेत जितका होईल तितका तो परभाषेतून होणार नाही. शिक्षण हे जर माणसातील पूर्णत्वाचे प्रकटीकरण असेल तर ते सिद्ध होण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे माध्यम नाही. शिक्षणातील आणि एकूणच मानवी जीवनातील मातृभाषेचे हे महत्त्व ओळखून तिला मातृभूमीप्रमाणे व्यक्तिगत, तात्कालिक उपयुक्ततेपलीकडचे मूल्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण हा व्यक्तीचा केवळ विशेषाधिकार न राहता ते एक सामाजिक, सांस्कृतिक दायित्वही बनते. मातृभाषेतून न शिकल्यामुळे व्यक्तिविकासाला मर्यादा तर पडतातच; पण एका अलिखित सामाजिक कराराचा भंगही होतो. महाराष्ट्रात मराठी शाळांतून शिकणे हा एक सामाजिक करार आहे आणि त्याचे पालन सर्वांनीच केले पाहिजे.
मराठी शाळांचा प्रश्न हा केवळ शैक्षणिक प्रश्न नाही. तो सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नही आहे. १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली ती केवळ प्रशासकीय सोय नव्हती तर जगातील प्रमुख २५ भाषांपैकी एक आणि थोर ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठी भाषेच्या स्वतंत्र राज्याची स्थापना होती. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि लोकभाषा आहे. तिचे जतन आणि संवर्धन करणे हे आपणा सर्वांचेच कर्तव्य आहे आणि तो पार पाडायचे म्हणजे मराठी भाषेचा शक्य तितक्या सर्व व्यवहारांत गुणवत्तापूर्ण वापर करणे. असा वापर करायचा म्हणजे मराठी शिकणे व शिकवणे आलेच. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार कोणत्याही भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक असतो. भाषेचे पिढ्यांतर्गत संक्रमण कोणत्याही भाषेच्या अस्तित्वाच्या व विकासाच्या केंद्रस्थानी असते असे भाषेचे अभ्यासक सांगतात. एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे भाषेचे संक्रमण करण्यासाठी ती भाषा शिक्षणाचे माध्यम असावी लागते. केवळ एक विषय म्हणून तिचा अभ्यास पुरेसा नाही. भाषेचा अध्ययन-अध्यापन व्यवहार नसेल तर तिच्या अन्य व्यवहारांना उत्तरोत्तर गळती लागते व ते कालान्तराने नष्ट होतात. मराठी नाटक, चित्रपट, साहित्य, पत्रकारिता व अन्य सार्वजनिक व्यवहार हे मराठी शिक्षणावर आणि अधिक नेमकेपणाने बोलायचे तर मराठी शाळांवर अवलंबून आहेत. जणू मराठी शाळा या मराठी भाषेची मुळे आहेत, तीच नष्ट झाली तर मराठी भाषावृक्षाचा वरचा विस्तार हळूहळू मातीला मिळेल. मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत, वाढवल्या पाहिजेत. कारण त्यांच्यावरच मराठी भाषेचे भवितव्य अवलंबून आहे. म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमाबाबत तटस्थ राहून मागणी तसा पुरवठा असे धोरण स्वीकारता येणार नाही. मराठी ही महाराष्ट्राची भाषिक, सामाजिक व सांस्कृतिक ओळख आहे. ती अबाधित व वर्धिष्णू ठेवायची असेल तर मराठी शाळांचा प्रश्न युद्धपातळीवर सोडवला गेला पाहिजे. जागतिकीकरणामुळे वाढलेले इंग्रजी भाषेचे प्रस्थ, शिक्षणाचे खासगीकरण, मराठीशी सोयरसुतक नसलेल्या अन्य भाषकांचे राज्यातील वाढते स्थलांतर आणि राजकीय इच्छाशक्तीचा संपूर्ण अभाव यामुळे मराठी भाषेपुढे न भूतोअसे आव्हान उभे राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेसाठी होती. आता तेवढीच मोठी चळवळ उभारण्याची गरज आहे ती मराठी राज्य टिकविण्यासाठी. भाषेकडे तटस्थपणे पाहणार्‍यांना आणि स्वभाषेविषयी कसलाच मूल्यभाव नसणार्‍यांना ही कदाचित अतिशयोक्ती वाटेल. पण मराठी शाळांची ही लढाई आपण हरलो तर मराठीची अख्खी लढाई आपण हरल्यासारखे आहे. मराठी शाळा हा मराठीचा आत्मा आहे. तो जपला पाहिजे.
मात्र राज्यशासनाने मराठी शाळांना परवानगी न देण्याचे आपले धोरण बदलले तरी मराठी शाळा टिकतील असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. मराठी शाळांचा लोकाश्रय वाढून त्यांना इंग्रजीप्रमाणे सामाजिक स्वीकृती व प्रतिष्ठा मिळायची असेल तर पन्नास टक्के सक्ती आणि पन्नास टक्के संधी हे धोरण स्वीकारावे लागेल. लोकांना इंग्रजी शाळा का हव्यात? त्यांना इंग्रजीविषयी प्रेम आहे म्हणून? मुळीच नाही. भाषा अस्मितेवर जगत नाहीत. त्या लोकांच्या पोटावर जगतात. इंग्रजी ही पोटापाण्याची, अर्थार्जनाची, सुखसमृद्धीची भाषा आहे. मराठी भाषेने याबाबतीत उपयुक्ततेचा नीचांक गाठलेला आहे आणि म्हणून लोक असहायतेपोटी इंग्रजीकडे वळत आहेत. मराठीचा अभिमान बाळगणार्‍यांची मुलेही इंग्रजी माध्यमात शिकतात हा विरोधाभास त्यातूनच निर्माण झालेला आहे. पण मराठी शाळांवर ही पाळी कोणी आणली? साठ-सत्तरच्या दशकात प्रगतिपथावर असलेल्या मराठी शाळांना आताच का घरघर लागावी? गेल्या दोन दशकांत असे काय घडले म्हणून लोकांचा मराठी शाळांवरचा विश्वास उडाला? या काळात मराठी भाषेचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी राज्य शासनाने कोणती सकारात्मक पावले उचलली? मराठीचे व्यावहारिक कुपोषण करून जगण्यासाठी एक निरुपयोगी भाषा अशी तिची प्रतिमा कोणी निर्माण केली?
मराठी माणूस मराठी शाळांपासून खुशीने दूर गेलेला नाही, तर राज्यशासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठीचे काही खरे नाही अशी हाय खाऊन त्याने इंग्रजी शाळांचा रस्ता धरलेला आहे. केवळ उच्चभ्रूच नव्हे तर तळागाळातील लोकांनीही आपल्या सामाजिक आणि आर्थिक अभ्युदयाची भाषा म्हणून इंग्रजीचा स्वीकार केला आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हे प्रमाण इतके वाढले की मराठीवरील प्रेमापोटी मुलांना मराठी शाळांत पाठवणारे पालक मागासलेले व वेडे ठरू लागले! अशी परिस्थिती केवळ आपल्याकडेच आहे असे नसून भारतातील इतर प्रांतांत विशेषत: मागासलेल्या राज्यांतही आढळते. मध्यंतरी राहुल गांधी उत्तर प्रदेशच्या दौर्‍यावर असताना एका खेड्यात उतरले. एका पददलित लेकुरवाळ्या महिलेची विचारपूस करताना मुले कोणत्या माध्यमात शिकतात म्हणून सहज विचारले. ती म्हणाली, ‘‘इंग्रजीत’’. राहुल गांधींनी आश्चर्याने विचारले, ‘‘इंग्रजीतच का हिंदीतून का नाही?’’ त्यावर या महिलेने जे उत्तर दिले ते भारतातील प्रादेशिक भाषांच्या अवनतीचे व इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाचे मर्म सांगणारे आहे. ती महिला म्हणाली ‘‘तुम्ही लोक चॉकलेटच्या वेष्टनावरही इंग्रजीतून लिहिणार मग आमच्या मुलांनी हिंदीत शिकून करायचे काय?’’ पोटा-पाण्याचे व्यवहार ज्या भाषेत होत नाहीत ती भाषा कोण आणि कशासाठी शिकणार?
मराठी शाळा वाचवायच्या असतील तर शाळांवर इलाज करून चालणार नाही; त्यासाठी व्यवहारातील मराठीवर इलाज करावा लागेल. मराठी भाषेचे व्यावहारिक, आर्थिक सक्षमीकरण करावे लागेल. म्हणजे प्रशासनाप्रमाणेच राज्यांतर्गत उद्योग, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, उच्च व व्यावसायिक शिक्षण, न्यायालयीन व्यवहार यात मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा लागेल. त्यासाठी सक्तीचा मार्ग अवलंबिण्यात काहीही गैर नाही. पण आपल्याकडे मराठीच्या बाजूने कायदे असूनही त्यांची अंमलबजावणी होत नाही. राज्यातील विद्यापीठांनी मराठीतूनही उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असे विद्यापीठ कायदा सांगतो; पण प्रत्यक्षात विद्यापीठांनी इंग्रजीच्या वर्चस्ववादाला खतपाणी घातले. राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयातील न्यायनिवाड्यांसह संपूर्ण कामकाज इंग्रजीऐवजी मराठीतून करावे असा राज्य शासनाचा व उच्च न्यायालयाचा आदेश आहे. पण तो संबंधितांनी धाब्यावर बसवला. राज्यातील केंद्रीय आस्थापनांनी आपल्या कामकाजात त्रिभाषा सूत्रानुसार मराठीचा वापर करावा अशी तरतूद असताना लिपिसाधर्म्याचा फायदा घेऊन केवळ इंग्रजी-हिंदीचा वापर करून मराठीची फसवणूक केली. मराठीच्या या व इतर व्यावहारिक अवमूल्यनामुळे लोकांची अशी समजूत झाली की, यापुढे इंग्रजी हीच व्यवहारभाषा असणार आहे. आपल्या राज्याला कसले भाषाधोरण नसल्याचा हा पुरावा आहे आणि आता तर लोकांनाच मराठीऐवजी इंग्रजी शाळा हव्या आहेत; असे सांगून राज्यकर्ते स्वत:च्या पापाचे खापर लोकांच्याच डोक्यावर फोडत आहेत.

माझी बोली माझा विकास

मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या ‘लोकप्रभा’च्या वाचकांकडून मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगणारी अनेक पत्रं आली. या वाचकांनी त्यांचं करिअर उत्तम पद्धतीने घडवलं आहे आणि हे करिअर करताना इंग्रजी भाषेतून शिक्षण न मिळाल्याचा त्यांना कोणताही पश्चात्ताप वाटत नाही.

अतुल कुलकर्णी -अभिनेता 

मातृभाषेतून शिक्षण घेणं हे केव्हाही फायद्याचं असतं. त्याचा तुम्हाला पुढच्या वाटचालीत नक्कीच फायदा होतो. जी भाषा आपल्या घरात बोलली जाते त्या भाषेत शिक्षण होणं हे केव्हाही गरजेचं आहे असं मला वाटतं. केवळ माझंच नाही तर अनेक शिक्षणतज्ज्ञांचंही हेच मत आहे

आपल्या भारतासारख्या देशामध्ये प्रत्येक प्रांतवार आणि प्रदेशवार भाषा बदलते. त्यामुळे मला असं वाटतं, आपल्याकडे भाषेची अवस्था खरोखरच खूप कठीण आहे. पहिलं कारण काय, तर आपण मुळातच खूप भाषा बोलतो. दुसरं कारण म्हणजे अर्थातच एक देश आणि त्याची एक भाषा म्हणून आपण हिंदीला महत्त्व देतो. सर्वसामान्यपणे आपण हिंदी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण हिंदी या भाषेलाही आपण महत्त्व देण्यात खूप यशस्वी झालोय असं मला वाटत नाही. त्यानंतरची भाषा म्हणजे इंग्रजी. इंग्रजी ही उच्चभ्रू वर्गाची आणि जागतिक व्यवहाराची भाषा आहे. त्यामुळे मर्यादित लोकांपर्यंतच ही भाषा पोहोचलेली आहे.
सोलापुरात माझं शिक्षण मातृभाषेतूनच झालं. शालेय शिक्षण सातवीपर्यंत मराठी माध्यमातूनच झालं. त्यानंतर गणित, विज्ञान हे विषय ८ वीपासून इंग्रजीतून शिकलो. अर्थात मातृभाषेतून शिक्षण घेणं हे केव्हाही फायद्याचं असतं. त्याचा तुम्हाला पुढच्या वाटचालीत नक्कीच फायदा होतो. जी भाषा आपल्या घरात बोलली जाते त्या भाषेत शिक्षण होणं हे केव्हाही गरजेचं आहे असं मला वाटतं. केवळ माझंच नाही तर अनेक शिक्षणतज्ज्ञांचंही हेच मत आहे. माझं शिक्षण सोलापुरात झालं त्या वेळी सोलापुरात उत्तम मराठी शाळा होत्या. त्या वेळी मुलगा इंग्रजी माध्यमातूनच शिकला पाहिजे असा आग्रह अजिबात नव्हता. आज मात्र काळ बदलला, त्याबरोबर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्या वेळी मराठी शाळा उत्तम होत्या. आज मात्र ही परिस्थिती फारशी स्वागतार्ह नाही.
मनोरंजनाच्या क्षेत्रात आल्यावर मला भाषेवर मेहनत घेणं गरजेचं होतं. दिल्लीमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना तीन र्वष हिंदी डिक्शनवर खूप मेहनत घेतली. तिथं माझा आणि हिंदी भाषेचा परिचय खूप जवळून झाला. अनेक हिंदी नाटकांचा अनुभव तिथंच गाठीशी बांधता आला. त्यामुळे हिंदी हे एनएसडीमध्ये असतानाच उत्तम शिकता आलं. मुळात मला भाषेची आवड असल्याने भाषेवर मेहनत घेणं फारसं कठीण गेलं नाही. त्यामुळेच हिंदी चित्रपट करताना मला कुठंही काहीच अडचण आली नाही. कुठलीही भाषा येणं तर गरजेचं आहेच, पण ती जाणून घेणं हे त्यापेक्षा जास्त गरजेचं आणि अधिक फायद्याचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे भाषा कुठलीही असो, ती जाणून घ्यायला हवी. तरच आपल्याला भाषेचा अडसर कधीही जाणवणार नाही



बुद्धिविकासासाठी मातृभाषाच साह्य़भूत -डॉ. सुनील इनामदार शिक्षण : B.A.M.S., M.D.(AYU) ( Gold Medalist)
 माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाले. दहावीला पुण्यात नूतन मराठी विद्यालय या शाळेत होतो तेव्हा मला ८५ टक्के मार्क मिळाले होते ११वी, १२ वीचे शिक्षण सांगलीच्या वेिलडव कॉलेजमधून घेतले. तेव्हा मला ८७ टक्के मिळाले होते. नंतर नाशिकच्या आयुर्वेद महाविद्यालयमधून बी.ए.एम.एस. पूर्ण केले. त्या वेळी सुवर्णपदक मिळाले. एम.डी. करण्यासाठीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आलो. नंतर गुजरात आयुर्वेद विद्यापीठातून एम.डी. केलं. तिथेही सुवर्णपदक मिळालं. मग संस्कृत टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृतमध्ये बी.ए. केलं. कोल्हापूरमध्ये गेली १५ र्वष हॉस्पिटल चालवतो आहे. आयुर्वेद क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबाबत Excellence of physician हा पुरस्कार महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते देण्यात आला. खडीवाले वैद्य संस्था यांच्या तर्फे उत्कृष्ट Panchakarma Physician हा पुरस्कार देण्यात आला. आज करिअरमध्ये ही कामगिरी केल्यानंतर मला मराठीचा अभिमान वाटतो हे आनंदाने सांगावसं वाटतं. मातृभाषेत प्रशिक्षण घेतल्याने मला कोणत्याही पदव्युत्तर शिक्षणात अडचण आली नाही. सुरुवातीला थोडे अडल्यासारखं वाटलं पण नंतर जाणवलं की तो न्यूनगंड होता. विषय समजण्याचा आत्मविश्वास हा मातृभाषेतील शिक्षणामुळेच मिळाला आणि त्यामुळेच आयुष्यात पुढे यशस्वी होऊ शकलो. म्हणून मातृभाषेतच प्रत्येकाने भाषण व बुद्धीविकासासाठी प्रशिक्षण घ्यावे. माध्यमिक नंतर द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी भाषेतून प्रशिक्षण घेण्यास व्यवहारातही फायदा होऊ शकतो.

विषयाचे ज्ञान आत्मसात करण्यातील सोपेपणा - संदीप प्रभाकर देवरे शिक्षण : बी. कॉम., एलएल. एम.

माझे संपूर्ण शिक्षण मराठी मातृभाषेतून झाले आहे. १९८० साली दहावी महात्मा गांधी विद्यालय, उरळी कांचन (जि.पुणे) येथून केले. दहावीला मला ६५ टक्के गुण मिळाले होते. १२वीला कॉमर्स मराठी माध्यमातून गरवारे कॉलेजमधून ६२ टक्के मिळवून उत्तीर्ण केले. नंतर पदवी शिक्षण बृहन् महाराष्ट्र कॉलेज येथून पूर्ण केले तेव्हा सेकंड क्लास मिळवला होता. एलएल.बी. मी पुण्याच्या लॉ कॉलेजमधून केला. त्या वेळी मला फर्स्ट क्लास मिळाला होता. नंतर पुणे विद्यापीठातून एलएल.एम.ही पूर्ण केले. गेली २२ वर्ष मी सेबीमध्ये आहे. सध्या माझी पोस्ट Joint legal adviser म्हणून आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये मी सेबीचं प्रतिनिधित्व केलं. या परिषदेसाठी दुबई , स्पेन, न्यूयॉर्क, वॉिशग्टन इथे भाग घेतला. या सगळ्यात मातृभाषेतून शिक्षण झाल्याने माझं कुठेही अडलं नाही. माझ्या मते भाषेचा उपयोग संभाषणासाठी होतो. पण त्यासाठी आपल्या क्षेत्रातील विषयाचे सखोल ज्ञान आणि आत्मविश्वास महत्त्वाचे ठरतात. मराठी भाषेत शिक्षण घेताना कोणत्याही विषयाचे ज्ञान आत्मसात करण्यात सोपे जाते.

मातृभाषेतून शिक्षणाचा न्यूनगंड नाही - प्रतीक्षा पिंगळे

माझे शालेय शिक्षण चिकित्सक समूह शिरोळकर विद्यालय, गिरगाव या मराठी शाळेतून झाले. नंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेसाठी प्रवेश घेतला. बारावीला ७१ टक्के गुण मिळाले. पदवी परीक्षा ७५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. २००२ साली मी सी ए. झाले. त्यानंतर २०१० साली डिप्लोमा आय. एफ.आर.एस. मध्ये ए.सी.सी.ए (यू.के.) पूर्ण केला. सध्या मी आय.आय.एम. लखनौमधून Executive MBA करीत आहे. नोकिया लोकेशन अ‍ॅण्ड कॉमर्स ह्य़ा कंपनीत भारताच्या अकाऊंट टीम प्रमुख म्हणून मी काम करीत आहे. नोकरीतील माझी जबाबदारी नपुण्यरीतीने करीत असल्याबाबत मला GLOBAL IMPACT AWARD हा पुरस्कार २०१० साली मिळाला. माझे शिक्षण मराठी या मातृभाषेतून झालेले असले तरीही मला उच्च शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण आलेली नाही. मराठी मातृभाषेतून शिक्षण घेतले तरीही कॉलेजमध्ये पहिल्या दिवसापासून भीतीही वाटली नाही किंवा नंतर इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना त्रास जाणवला नाही.

मातृभाषेतून शिक्षणाचा मर्यादित अभिमान -अवधूत साठे

मातृभाषेतून शालेय शिक्षण घेतले, यूडीसीटीसारख्या नावाजलेल्या अभियांत्रिकी संस्थेतून केमिकल इंजिनीअर झालो आणि केंद्र सरकारच्या एका उपक्रमातून कार्यकारी निदेशक (Executive Director) या पदावरून निवृत्त झालो. हे पद निदेशक मंडळाच्या (Board of Directors) एक स्तर खाली असते व ते लक्षात घेऊन मी स्वत:ला करिअरमध्ये मर्यादित प्रमाणात तरी यशस्वी समजतो. मातृभाषेतून घेतलेल्या शालेय शिक्षणामुळे मला ज्युनिअर कॉलेज ( तेव्हाचे एफ.वाय. व इंटर सायन्स) मधे सायन्स विषय समजून चांगले मार्क मिळविण्यात काहीच अडचण जाणवली नाही. त्या मार्काच्या जोरावर मला यूडीसीटीसारख्या नावाजलेल्या अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश मिळाला. परंतु वर्गातील इतर मुलामुलींबरोबर इंग्रजीतून संवाद साधताना अपुऱ्या शब्दभांडारामुळे एक न्यूनगंड जाणवे. हा न्यूनगंड पुढे नोकरीत इतर सहकाऱ्यांबरोबर कामाव्यतिरिक्त विषयावरील संवादांमध्येही जाणवे. परंतु हा न्यूनगंड मातृभाषेतून शालेय शिक्षण घेतलेल्या इतर काही सहकाऱ्यांत आढळला नाही. माझ्या मते याची खालीलप्रमाणे दोन-तीन कारणे असावीत. एक म्हणजे माझ्या शाळेतील इंग्रजी विषय शिकविण्यातील त्रुटी, दोन म्हणजे त्यावर मात करण्यासाठी मी घेतलेली अपुरी मेहनत (इंग्रजी कथा-कादंबऱ्या वाचणे) आणि तीन म्हणजे माझी स्वतवरील विश्वासातील (confidence) त्रुटी. यासाठी मातृभाषेतून घेतलेल्या शालेय शिक्षणाला दोष देणे योग्य होणार नाही. परंतु मराठी माध्यमाच्या शाळेत इंग्रजी विषय शिकविण्यात सुधारणा करण्याची गरज यामुळे नक्कीच अधोरेखित होते. करिअरमध्ये आणखी पुढे जाण्यासाठी सोशल नेटवìकगची गरज असते व ते करण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असणे जरुरी आहे. ते कदाचित इंग्रजी माध्यमातील शिक्षणाने सहज शक्य झाले असते, परंतु त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जावे असे मी कधीही म्हणणार नाही. जबर महत्त्वाकांक्षा असणाऱ्या व्यक्तीला ते अधिक मेहनतीने इतर प्रकारे साध्य करणे शक्य आहे.

शिक्षणाच्या माध्यमनिवडीचा गोंधळ - ऋता राजेश हाटे

आजचे शिक्षण हे ज्ञानसंपदा वाढवण्याच्या दृष्टीने पांगळे आहे. कारण त्या ज्ञानातून शेवटी मिळते, ती कागदी पदवी, अनुभव नाही. अनुभवांच्या ज्ञानाची शिदोरी गाठी ना पाठी म्हणून अपयशी जीवनाची सुरुवात होते. आज ज्ञानाचा किंवा शिक्षणाचा विचार हा साधारणत: पुस्तकी शिक्षणाच्याच दृष्टीने व पशांच्या दृष्टीने केला जात आहे. म्हणूनच शिक्षणाचे माध्यम निवडताना इंग्रजीची निवड प्राधान्याने केली जाते. पण शिक्षणाचे माध्यम निवडताना अतिशय सावध असावे. शिक्षणाचे किंवा ज्ञान घेण्याचे माध्यम जर उचित असेल तर व्यक्तीची मानसिक, बौद्धिक व शारीरिक उन्नती साधणे सोपे जाते. सर्वसाधारणपणे इंग्रजी भाषेत शिकल्याने मुले सर्वाथाने पारंगत होतील, हा पालकांचा समज असतो. हा समज चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. कारण समज करून देणारा आजूबाजूचा समाज चुकीचा आहे हे सांगणारे व ऐकणारे उरलेले नाहीत. जे सांगतात तेच त्यांच्या लेखी वेडे ठरतात. व्यक्तींकडे शब्दसंपदा अधिकाधिक असेल, तर त्याचे भाषेवर पर्यायाने वाणीवर प्रभुत्व असते. भाषा शब्दसंपदेने परिपूर्ण असता प्रत्येकाला आपले विचार आपल्या शब्दांत मांडता येतात. मनातील विचार व्यक्त झाल्याने मानसिक दडपण दूर होते. आपले विचार नवख्या भाषेत सांगणे माध्यमाच्या निवडीने अशक्य होते किंवा ते विचार व्यक्त करताच येत नाहीत. कारण परप्रांतीय भाषेतील शब्दांची संपदा ही शिक्षणापुरतीच सीमित असते. त्यामुळे विद्यार्थी, ज्ञानार्थी न होता छापखानाच तयार होतो. शैक्षणिकदृष्टया खोलवर विचार केला तर मातृभाषेत शिकणाऱ्याला मातृभाषेचे व्याकरण सहज जमते. त्यासाठी कोणतेही जास्तीचे परिश्रम करावे लागत नाहीत. त्याला नवीन भाषेसाठी पुरेपूर वेळ देता येतो व त्यातील बारकावे, व्याकरणाचे तो पुरेपूर ज्ञान घेऊ शकतो. परिणामी त्याच्या दोन्ही भाषा व्याकरणासह पक्क्या होतात. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर इंग्रजीचे ज्ञान घेतल्यास दोन्ही भाषांवर प्रभृत्व मिळविणे अशक्य नाही.