Pages

Monday, December 2, 2013

आपल्या मातृभाषेत शिक्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आहे !

लॉर्ड मॅकालेने म्हटले होते : ’
मी येथील शिक्षण-पध्दतीत असे काही संस्कार टाकून जात आहे की येणार्‍या काही वर्षात भारतवासी आपल्याच संस्कृतीची घृणा करू लागतील....मंदीरात जाणे पसंत करणार नाहीत.... आई-वडीलांना नमस्कार करण्यात त्यांना स्वत:ला अपमान वाटेल...ते शरीराने तर भारतीय असतील पण मन बुध्दीने आमचेच गुलाम असतील....’
आपल्या शिक्षण-पध्दतीत मॅकालेने टाकलेल्या संस्कारांचा प्रभाव आज स्पष्टपणे दिसून येत आहे. आजचे विध्यार्थी शिकून-सवरून पदवी घेऊन बेरोजगार होऊन नोकर बनण्यासाठी भटकत राहतात.
 महात्मा गांधींच्या शब्दांत : "कोट्यावधी लोकांना इंग्रजी शिक्षण देणे हे त्यांना गुलामीत टाकण्यासारखे आहे.मॅकालेने शिक्षणाचा जो पाया रोवला, तो खरोखरच गुलामीचा पाया होता. ही काय कमी अन्यायाची गोष्ट आहे की आपल्या देशात जर मला न्याय हवा असेल तर मला इंग्रजी भाषा वापरावी लागेल ! भारताला गुलाम बनविणारे तर आपण इंग्रजी जाणणारे लोक आहोत. प्रजेचा तळतळाट इंग्रजांना नव्हे तर आपल्यालाच लागेल." इंग्रजीचा आपल्या जीवनावर किती दुष्प्रभाव पडतो, याविषयी गांधीजींनी म्हटले आहे :
"विदेशी भाषेतून शिक्षण घेताना जे ओझे डोक्यावर पडते ते असह्य आहे. हे ओझे केवळ आपली मुलेच उचलू शकतात परंतू त्याची किंमत त्यांनाच चुकवावी लागते. ती दुसरे ओझे उचलण्याच्या लायकीची राहत नाहीत. यामुळे आपले पदवीधर बहुतांशी कामचुकार, अशक्त, निरुत्साही, रुग्ण आणि कोरे नक्कलबाज बनतात, त्यांच्यातील संशोधन शक्ती, विचार करण्याची शक्ती, साहस, धैर्य, शौर्य, निर्भयता इ. गुण खूपच क्षीण होतात. यामुळे आपण नव्या योजना आखू शकत नाही. काही, आखल्यातरी त्या पूर्ण करू शकत नाही.
काही लोकांमध्ये वरील गुण दिसून येतात, ते अकाल मृत्यूला बळी पडतात.”
 गांधीजी पुढे म्हणतात : "आईच्या दुधासोबत जे संस्कार मिळतात आणि जे गोड शब्द ऐकू येतात, त्यांच्यात आणि शालेय शिक्षणात जो सुमेळ असला पाहीजे, तो विदेशी भाषेतून शिक्षण घेतल्याने तुटून जातो. आपण अशा शिक्षणास बळी पडून मातृद्रोह करतो."

रविंद्रनाथ टागोरांनीही मातृभाषेचा अत्यंत आदर केला. त्यांनी म्हटले होते : "आपल्या मातृभाषेत शि़क्षण घेणे हा जन्मसिध्द अधिकार आहे. मातृभाषेत शिक्षण द्यावे की नाही अशा प्रकारची चर्चा होणेच निरर्थक आहे." त्यांची मान्यता होती की 'ज्याप्रकारे आपण आईच्या कुशीत जन्म घेतला आहे, त्याचप्रकारे मातृभाषेच्या कुशीत जन्म घेतला आहे. या दोन्ही माता आपल्यासाठी सजीव आणि अत्यावश्यक आहेत.

गांधीजींनी मातृभाषा-प्रेम व्यक्त करताना म्हटले की "माझ्या मातृभाषेत कितीही चुका का असेना, मी त्या मातृभाषेला अगदी तसाच कवटाळून राहीन, जसे मूल आईच्या छातीशी कवटाळून राहते. तीच मला जीवनदायी दूध देऊ शकते. मी इंग्रजीला तिच्या जागी प्रेम करतो परंतु इंग्रजी माझ्या मातृभाषेचे स्थान हिरावून घेऊ पाहते ज्याची ती हक्कदार नाही. यामुळे मी इंग्रजीचा आवर्जून तिरस्कार करेन. मी या भाषेला केवळ बोलीभाषेच्या रूपात स्थान देईन परंतु विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमात, शाळांमध्ये नाही. ती काही लोकांच्या शिकण्याची बाब असू शकते, लाखो-करोडोंची नव्हे !

रशियाने इंग्रजीशिवायही विज्ञानात इतकी प्रगती केलेली आहे. आज आपल्या मानसिक गुलामगिरीमुळेच आपण हे मानू लागलो आहोत की इंग्रजीविना आपले काम होणार नाही. मी या गोष्टीशी जराही सहमत नाही." विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिक्षण देणे हे मानसशास्त्रीय आणि व्यावहारिक दृष्टिकोणातून अत्यावश्यक आहे. कारण शाळेत आल्यावर मुले जेंव्हा आपली भाषा व्यवहारात आलेली पहातात तेंव्हा ते शाळेप्रती आत्मीयतेचा अनुभव करू लागतात. त्याचबरोबर त्यांना सर्वकाही जर त्यांच्याच भाषेत शिकविले तर त्यांच्यासाठी सर्व गोष्टी समजणे अगदी सोपे होते.

भारतेंदू हरिश्चंद्र यांनीही 'निज भाषा' म्हणून मातृभाषेचे महत्व व प्रेम आपल्या खालील सुप्रसिध्द दोंह्यांच्या रुपात व्यक्त केले आहे : निज भाषा उन्नति अहै, सब उन्नति को मूल I बिन निज भाषा-ज्ञान के, मिटत न हिय को सूल II उन्नति पूरी है तबहिं, जब घर उन्नति होय I निज शरीर उन्नति किये, रहत मूढ सब कोय II

रवींद्रनाथ टागोरांनी जपानचा दृष्टांत देताना सांगितले की "या देशाची जितकी प्रगती झाली आहे, ती त्यांच्या जपानी भाषेमुळेच झाली आहे. जपानने आपल्या भाषेच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि इंग्रजीच्या प्रभुत्वापासून जपानी भाषेला दूर ठेवले." जपानी लोक यासाठी धन्यवादास पात्र आहेत कारण जेव्हां ते अमेरिकेत जातात तेव्हां तेथेही आपल्या मातृभाषेतच बोलतात.....आणि आपण भारतवासी !

भारतात राहत असूनही आपल्या मराठी, हिंदी, गुजराती इ. भाषांमध्ये इंग्रजी शब्दांची भेसळ करतो. गुलामगिरीच्या मानसिकतेने अशी वाईट सवय लावली आहे की तिच्याशिवाय राहवत नाही. स्वातंत्र्य मिळून ६४ वर्षाहूनही जास्त काळ लोटला, बाह्य गुलामगिरीच्या बेड्या तर तुटल्या पण ही आंतरिक गुलामगिरी, मानसिक गुलामगिरी अजूनपर्यंत गेलेली नाही. रवींद्रनाथ टागोरांनी चिंतन करताना सर्वसामन्य लोकांसाठी हा महत्वाचा विचार व्यक्त केला आहे की 'अनावश्यक गोष्टीस जितक्या प्रमाणात आपण अत्यावश्यक बनवू तितक्याच प्रमाणात आपल्या शक्तीचा र्‍हास होत जाईल. युरोपसारखे आपल्याकडे संबळ नाही. युरोपिअन लोकांसाठी जे सुलभ आहे, आपल्यासाठी तेच ओझे होते. सुगमता, सोज्ज्वळता आणि सहजता हीच खरी संस्कॄती आहे. आत्यधिक आयोजनाची जटिलता एक प्रकारचा अत्याचार आहे.' म्हणून आपल्या मातृभाषेचा महिमा ओळखा आपल्या मुलानां इंग्रजीत शिक्षण देऊन त्यांच्या विकासात अडथळा आणू नका. त्यांना आपल्या मातृभाषेत शिकण्याचे स्वातंत्र्य देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासात सहभागी व्हा. कोणीही असे माता-पिता नसतील, जे आपल्या मुला-मुलींचे कल्याण वा प्रगतीची इच्छा करणार नाही. ते करतातच, केवळ गरज आहे तर आपली विचारधारा बदलण्याची !

इंग्रजी माध्यमाचा अट्टहास का ???

हल्ली भारतात (खास करून महाराष्ट्रात)सर्वसाधारणपणे सर्व थरातील पालकांनी आपल्या पाल्यांना पूर्व-प्राथमिक धरून सगळे शिक्षण इंग्रजीतून देण्याचा चंगच बांधलेला दिसतो. जणू काय ‘शिक्षण म्हटले की ते इंग्रजीतूनच झाले पाहिजे’ आणि ‘इंग्रजीतून शिक्षण हेच फायदेशीर आहे’ असे गृहितच धरले आहे. एकदा एखादी गोष्ट आपण गृहीत धरून चाललो की तिच्या अन्य बाजू नजरेआड केल्या जातात. इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवण्याचे तोटे जरी समोर आले तरी त्या संबंधीची चर्चा टाळली जाते किंवा भरमसाट पैसे मोजल्यामुळे हे तोटे कबूल करण्याची हिंमत नसते. ‘इंग्रजी ही जागतिक भाषा’, ‘इंग्रजीतून शिकल्यामुळे प्रगती’ अशी मानसिकता घडल्यामुळे तोटे दिसले तरी त्याची जबाबदारी न घेता उलट त्या दुष्परिणामांचे खापर बापड्या मुलांवरच फोडले जाते. ‘मुलं शिकतच नाहीत’चे पालुपद लावतात व मोकळे होतात. भंपक प्रतिष्ठेची झापडे लावलेल्या पालकांकडून शिक्षणाच्या माध्यमाचा सारासार विचार होणे नाही. परक्या भाषेतून जी भाषा शिकल्याशिवाय बोलताही येत नाही, ती परकी भाषा. अशा परक्या भाषेतून शिकताना मुलांना कशा प्रकारची कसरत करावी लागते, याचे भान पालकांना राहत नाही किंवा जाणूनबुजून ते दुर्लक्ष तरी करीत असावेत. माध्यमाच्या आकर्षणामुळे बहुसंख्य लोकांना इंग्रजी हवे आहे. लहान वयात अगदी सहजतेने मुले आठ-दहा इंग्रजी गाणी (नर्सरी र्‍हाईम्स) म्हणतात. ए-बी-सी-डी तोंडपाठ म्हणतात. ते ऐकून आई-बाबांना वाटते की, आता या मुलाला इंग्रजी माध्यमात घालायला काहीच अडचण नाही. मुले तिसरीत-चौथीत पोहोचली की लक्षात येते की, इंग्रजीमुळे आपल्या मुलाची प्रगती खुंटते आहे. शाळेतील सर्व विषय इंग्रजीतून शिकायचे असल्यामुळे त्यांचा अभ्यास कित्येकवेळा अतिशय कष्टप्रद होतो. पदरात काय पडते तर घोकंपट्टी व पोपटपंची. हे सगळे करवून घेण्यासाठी पूर्व प्राथमिकपासून ट्यूशन क्लासेस! त्यामुळे मुले कुठल्याच विषयावर स्वतंत्रपणे विचार करू शकत नाहीत. स्वतंत्र विचार म्हणजे काय हेच त्या बिचार्‍यांना माहीत झालेले नसते. त्यामुळे एकूण शिक्षणावरच मर्यादा पडतात. कधी कधी सहावीपर्यंतचा काळ जातो. पण या वयात धड ना इकडचे ना तिकडचे होऊन मुले त्रिशंकू होतात. परतीचे दोर तर केव्हाच कापलेले असतात. परक्या भाषेतून शिक्षण घेताना मुलांना सोसावा लागणारा हा सर्वांत मोठा तोटा होय. मुलांची स्थिती दयनीय होते. काही मुले वैफल्यग्रस्त होतात. बर्‍याचजणांचे लक्ष अभ्यासावरून पुरते उडालेले असते. अंगात एक प्रकारची बेफिकिरी आणि त्याच बरोबरीने अपरिहार्यपणे येणारा कोडगेपणा, यामुळे आई-वडील अत्यंत चिंताग्रस्त, संतापी आणि हतबल बनतात. त्याचबरोबर निराश किंवा बेफिकीर मुले यामुळे कुटुंबाचे स्वास्थ्य हरवून बसतात. कदाचित याच कारणासाठी मुलाला चौदा वर्षेपर्यंत शाळेच्या छप्पराखाली ठेवण्याच्या संविधानात दिलेल्या वचनपूर्तीसाठी सरकारने ‘शिक्षण हक्क कायदा’ केलेला असावा. या कायद्यानुसार विद्यार्थ्याला म्हणे आठवीपर्यंत नापास करता येत नाही. म्हणजे सहाव्या वर्षी पहिलीत आलेला विद्यार्थी वयाच्या चौदाव्या वर्षीपर्यंत ‘आठवी पास’ झालेला असेल. वयाची चौदा वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलाला शाळेच्या छप्पराखाली ठेवण्याचे संविधानातले वचन पाळल्याचे समाधान! पुण पुढे काय? ते मूल काय शिकलेय? त्याच्या ज्ञानाचा स्तर काय? ते पुढे दहावीपर्यंत-पदवी पर्यंत पोचते का? देशाला चांगले जबाबदार नागरिक मिळण्यासाठी त्यांच्याकडे सरकारने व्यवस्थित लक्ष द्यायला नको काय? एका पाहणीत असे दिसून आले आहे की, प्राथमिक शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त १० टक्के मुले मॅट्रीकपर्यंत पोचतात आणि या दहा टक्क्यातील फक्त चार टक्के पदवीपर्यंत पोहोचतात! या मागचे कारण काय असेल? या कारणाच्या मुळाशी पोचणे म्हणजेच मातृभाषेतून शिक्षण का आवश्यक आहे? या प्रश्‍नाच्या उत्तराकडे पोचणे आहे. याआधारे विचार करताना स्पष्ट होते की, परक्या भाषेतून निर्माण झालेला आशय प्रभावी पद्धतीने मनापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे हा आशय पाठ करूनच स्मरणात ठेवण्याची सवय लागते. ‘अभ्यास म्हणजे पाठ करणे आणि परीक्षेला ओकून टाकणे’ असे समीकरण यामुळेच झालेले आहे. कोणत्याही विषयाचे परिपूर्ण आकलन होण्यासाठी स्वतःचा आशय निर्माण करणे आवश्यक आहे आणि हे मातृभाषेतूनच साध्य होऊ शकते. मुळातच काहीही सुचते ते सुचण्याची भाषा ‘मातृभाषाच’ असते. ती मुलांमधली सर्जनशीलता फुलवत नेते. परक्या भाषेतून सर्व समजून घेताना, समजलेले व्यक्त करत असताना त्यातली सहजता नष्ट झाल्याने ही प्रक्रिया यांत्रिकपणे होते आणि बालवयापासूनच म्हणजे ‘घडणीच्या’ वयापासून त्यांच्या अंगात ही यांत्रिकपणा भिनते. याउलट मातृभाषेतून शिक्षण घेण्याची संधी लाभल्यावर सभोवतालच्या विविधांगी अनुभवांना सक्षमपणे भिडता येते. मेंदूतील विविध ग्रहण क्षमता आणि जाणिव समृद्ध होत जातात. यशपाल समितीच्या अहवालातील हीच गोष्ट सूचित करण्यात आली आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रुसो म्हणतात, ‘प्रौढांनी दडपण आणल्यामुळे बालकांच्या स्वतःच्या आवडीनिवडी व भावना दडपल्या जातात आणि मग त्यांच्यात कृत्रिमता व खोटेपणा निर्माण होतो.’ मुलांचा विचार ‘मूल’ म्हणून केला पाहिजे. आपण ठरविलेल्या फुटपट्‌ट्या लावून तो बंद करू नका. हे सांगणार्‍या जगभरातील शिक्षणतज्ज्ञांच्या म्हणण्यातील तथ्य संवेदनशिलतेने जाणून घेतल्यास मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व उलगडत जाते. प्रत्येक मूल हे वेगळे असते. अगदी जुळी मुलेसुद्धा. प्रत्येकाची वेगळी स्वतंत्र विचारपद्धती आणि क्षमता असते. त्यांच्या आधारे आणि स्वतःला येणार्‍या अनुभवांच्या सहाय्याने ते शिकत जाते. या सबंध प्रक्रियेत पाय रोवून उभे राहण्यासाठी मुलांना मातृभाषेतून शिक्षणाची भक्कम जमीन हवी असते. पण इंग्रजीसारख्या परक्या माध्यमात मुलांना ढकलून त्यांच्या पायाखालची ही जमीनच पालक हिरावून घेत आहेत. मातृभाषा ग्रहण करण्यात जर त्रुटी राहिली किंवा तिच्यापासून मुलांना दूर करण्याचा प्रयत्न केला किंवा करत राहिलात तर त्यांच्या भाषाविकासात अडथळे येतीलच. त्याशिवाय अन्य विषयांच्या ग्रहणातही हे अडथळे अडसर ठरतात. कोणत्याही विषयांतील संकल्पना मातृभाषेच्याच आधारे अधिकच सुस्पष्ट होतात. अन्यथा त्या पाठ करून स्मरणात ठेवाव्या लागतात आणि त्यामुळे त्या संकल्पना समजून घेण्यातला आनंद हरवतो व त्यांच्या गाठोड्याचा भार वाहणे एवढेच उरते. पुष्कळवेळा वाटचालीत ते गाठोडे हरवते वा त्यांत साठवलेल्या संकल्पनांचा विसर पडतो. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ श्री. कृष्णकुमार यांनी म्हटले आहे, ‘भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसते तर कल्पनाशक्तीच्या विकासाचे व विचार शक्तीच्या विकासाचे एकमात्र साधन असते.’ मातृभाषेतून शिक्षण घेण्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊन तो समाजाशी, देशाशी व संस्कृतीशी पूर्णतः जोडला जातो.

Sunday, December 1, 2013

इंग्रजी माध्यमातून मुलांचे हाल का करता ???

जन्माला आल्यापासून बालक शिकू लागते. आपण त्याला शिकण्यात मदत करायची असते. शाळा किंवा पुस्तकातून जे शिकवले जाते तेच शिक्षण; अशी एक ठाम समजूत आज मुलांचे प्रचंड नुकसान करते आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मोठ्या प्रमाणात पालकच पदरचे पैसे खर्चून मुलांच्या शिक्षणाची नासाडी करत असतात. पी ह्ळद आणि हो गोरी, अशी एक म्हण आपल्या मराठी भाषेत प्रसिद्ध होती. आता ती म्हण किंवा उक्ती राहिलेली नाही. कारण आता तरुण मुलींना गोरेपणा हवा असेल, तर हळद वापरावी लागत नाही. वेगवेगळ्या कंपन्या झटपट गोरेपण देणार्‍या क्रिमच्या ट्युब बनवून बाजारात विकत असतात. मग मुलींसाठी वेगळे क्रिम असते आणि मुलांसाठी वेगळे क्रिम असते. त्याच्यासाठीच्या जाहिराती बघितल्या, मग मुलांची गोरे होण्यासाठी झुंबड उडते. तोच प्रकार मुलांना हुशार व बुद्धिमान बनवण्यासाठी पालकांच्या बाबतीत चालू आहे. कोणी जाहिरातीमधुन मुलांना दूधातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही म्हणून आपल्या डोक्यात घालते, तर कोणी कुठले टॉनिक घेऊन मुल वर्गात कशी फ़टाफ़ट उत्तरे देते हे दाखवते. मग आपण त्या डबे वा ट्युबा घेण्यासाठी दुकानात धाव घेतो. त्याच पद्धतीने नावाजलेल्या शाळा ही आता दुकाने बनली आहेत. आमिरखानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची "जनकलियाण" सहयोगी असलेली रिलायन्स फ़ाऊंडेशनही मुंबईत अशीच एक अत्यंत महागडी शाळा चालवते. तिथे शिकणार्‍या एका मुलाच्या पालकाने दिलेली रक्कमसुद्धा सत्यमेव जयतेच्या एका भागाला देणगीपेक्षा अधिकच असते. सामान्य कष्टकर्‍याला वर्षभरात जेवढे पैसे मिळवता येणार नाहीत, इतकी त्या शाळेत महिन्याची नुसती फ़ी आहे. तिथे सचिन तेंडूलकर वा शाहरुख खानची मुले शिकायला जातात. ती आपोआपच हुशार होणार हे गृहीत आहे. त्यांच्या तुलनेत कमी दर्जाच्या शेकडो शाळा व शिक्षण संस्था आज तालुक्याच्या गावातही उभ्या राहिलेल्या आहेत आणि "जनकलियाण" करत आहेत. लाखो रुपयांच्या देणग्या व हजारो रुपये फ़ी भरून प्रवेश मिळवायला पालक त्यांच्या दारात अनेक महिने आधीपासून रांगा लावत असतात. मग तिथे प्रवेश मिळाला तर भारतरत्न मिळवल्याप्रमाणे अभिमानाने त्याची मित्र परिचितांमध्ये जाहिरात सुद्धा करतात. पण खरेच अशा शाळांची गरज आहे काय? शाळा हा मुलांना हुशार व अभ्यासू बनवणारा कारखाना आहे काय? पालक इतकी प्रचंड रक्कम का खर्च करतो? याचे पहिले कारण इंग्रजी माध्यमाचे आकर्षण हेच आहे. मी मुंबईत वास्तव्य करतो, त्या म्हाडा कॉलनीमध्ये जवळपास प्रत्येक इमारतीमधे एका खोलीत तरी शाळकरी मुलांसाठी शिकवणी वर्ग आहेत. घरबसल्या तिथे गृहीणी त्या मुलांचा अभ्यास घेतात व पालकांकडून चांगले पाचशे हजार रुपये फ़ी उकळतात. पाचसात वर्षाची ती केविलवाणी मुले पाहून मला खरेच त्यांची दया येते. एकदा अशा क्लासमध्ये शिकवणार्‍या तरुण मुलीला काय शिकवते असे विचारले. कारण ती स्वत:च तीनदा दहावीच्या परिक्षेला नापास झाल्याचे मला ठाऊक होते. ती उत्तरली, राईट-रॉंग करून घेते. मला त्याचा काहीच बोध झाला नाही. म्हणून खुप खोदून विचारले, तेव्हा उलगडा झाला. ज्या पालकांचे शिक्षण आपल्या मातृभाषेतही दहावीपर्यंत नीट झालेले नाही, अशा पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत हट्टाने घातले आहे. पण तिथे जो घरचा अभ्यास म्हणजे होमवर्क दिले जाते, त्याची पुर्तता करताना पालक मुलांना मदत करू शकत नाहीत. त्यांची सोय करण्यासाठी हे क्लास सुरू झाले आहेत. मग होते काय? तर सहा तास मुले शाळेत जातात, घरी आल्यावर कुणाच्या तरी क्लासमध्ये होमवर्क पुर्ण करण्यासाठी जातात. त्यातच थकून जातात. त्यांना विश्रांती घ्यायलाही सवड मि्ळत नाही तर खेळायला मोकळीक कशी मिळायची? आणि दिवसातले दहा बारा तास त्या मुलांना पुस्तकातले उतारे लिहून वाचून काढावे लागतात. ते समजून घ्यायला, त्यावर विचार करायला सवडच दिली जात नाही. हे प्रश्न आणि ही उत्तरे; अशी अवस्था आहे. प्रश्नही त्यांना समजलेला नसतो. मग त्याचे उत्तर समजण्याचा विषयच कुठे येतो? उत्तर शोधणे दुरची गोष्ट झाली. जे उत्तर लिहिले वा सांगितले तेच उत्तर का आहे, तेही मुलाला कळण्याची कोणाला गरज वा्टत नाही. मग शिकणार काय? प्रश्न व उत्तरे यायला हवीत, तो विषय कळण्याची गरजच उरत नाही. पण आपले मुल एबीसीडी म्हणते, बड्बडते यावरच पालक खुश असतो. शिकण्यासाठी मुलात समजावे लागते, याचाच आपल्याला विसर पडला आहे. घोकंपट्टी म्हणजे अभ्यास म्हणजेच शिक्षण, ह्या गैरसमजाचा तो परिणाम आहे. शिकण्यासाठी समजायचे तर त्या मुलाला समजणार्‍या भाषेत व माध्यमात शिकवायला हवे. समजणारी भाषा मातृभाषाच असते. ती भाषा समजणारी असल्याने शिकणे सोपे जाते. आपण जी भाषा सातत्याने जगण्यात वापरत असतो, त्याच भाषेत आपण विचारही करत असतो. आणि शिकण्याची प्रक्रिया ही विचाराशी संबंधित आहे. मुलांची गोष्ट बाजूला ठेवा. तुम्ही स्वत:चा विचार करा. तुम्हाला कोणी तामीळ भाषेत प्रश्न केला तर काय होईल? आधी तो प्रश्न तुम्हाला आपल्या भाषेत समजून घ्यावा लागेल. मग त्याचे उत्तर तुम्ही आपल्या भाषेत तयार करणार आणि त्यानंतर त्याचे तामीळी रुपांतर त्या व्यक्तीला सांगणार ना? आपल्याला धड हिंदी बोलता येत नाही, तर आपले किती हाल होतात? मग इवल्या बालकाचे त्या कोवळ्या वयात भलत्याच भाषेत व्यवहार करण्यात किती हाल होत असतील, याची नुसती कल्पना करा. आपली हौस म्हणुन आपण मुलांना इंग्रजी माध्यमात घालतो, तेव्हा मुलांमधल्या उपजत शिकण्याच्या प्रवृत्तीचा आपण कोंडमारा करून टाकत असतो. त्याच्या शिकण्याच्या उत्साहात अडथळे आणत असतो. इंग्रजी माध्यम म्हणजे मुल हुशार करण्याचा सोपा मार्ग शोधल्याचा तो दुष्परिणाम आहे. अर्थात जे पालक घरातही मुलाशी इंग्रजीत बोलू शकतील, त्यांनी त्या मार्गाने जाणे उपयुक्त असेल. पण ज्या घरात इंग्रजीचा व्यवहारी वापर होत नाही, त्या घरातल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणे, म्हणजे त्याचे बौद्धिक कुपोषण करणेच आहे. त्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत. पण सहासात वर्षांनी दिसू लागतात. पण तोवर मागे फ़िरण्याची वेळ टळून गेलेली असते. पहिलीपासून मुलांना इंग्रजी भाषा येण्याची काहीही गरज नसते. किंबहुना कुठलीही भाषा किंवा विषय शिकण्याची गरज नसते. चौथी म्हणजे मुलाच्या वयाच्या नऊ दहा वर्षापर्यंत त्याला शिकण्याविषयी आस्था व गोडी लावणे, एवढाच शाळेचा हेतू असतो. शिकायचे कसे हे शिकण्याचे ते वय असते. त्यावेळी कुठलाही विषय वा भाषा मुलांना शिकवणे, म्हणजे त्याच्या शिक्षणाचा पाया घालण्याच्या वयाची नासाडी असते. मग ते मुल एक भाषा शिकण्यात आपली क्षमता खर्च करते आणि शिकायचे कसे त्यात कमजोर राहून जाते. उलट त्या कोवळ्या वयात मुल मातृभाषेत शिकले तर त्याला विषयातला आशय आत्मसात करण्याचे कौशल्य मिळवता येते. ते मिळवले मग पुढल्या वयात अन्य विषयांप्रमाणेच त्याला इंग्रजी भाषाही सहजगत्या आत्मसात करता येते. पण कोवळ्या वयात इंग्रजीसाठी विषय आत्मसात करण्यात कमजोरी आली, मग पुढल्या वयात सर्वच विषयांचे आकलन करताना मुल कमी पडू लागते. म्हणूनच इंग्रजी किंवा मातृभाषा सोडून अन्य माध्यमात मुलांना शिकवणे घातक असते. पण हे कोणी कोणाला सांगायचे? मी हे अनुभवाचे बोल सांगतो आहे. आणि ते सांगताना, मी त्याचा अनुभव स्वत:च्या मुलीला मातृभाषेच्या माध्यमात शिकवून घेतला आहे. म्हणूनच मोठी दे्णगी वा फ़ी मोजून मुलांवर अफ़ाट खर्च करताना मेटाकुटीस येणार्‍या पालकांची मला दया येते. मुलांसाठी ते पैसे कमावतात, खर्चही करतात, पण बहुतांश पालक मुलाचे नुकसानही करत असतात. त्याचे एक कारण असे की सहसा पालक आपल्या मुलांना समजून घेतच नाहीत. स्वत:ला जागरुक म्हणवून घेणारा पालकही स्वत:च्या मुलाविषयी संपुर्ण अंधारात असतो. पैसा कमावण्याच्या मागे पळताना त्याला मुलाला समजून घ्यायला सवड मिळत नाही. मग तो मुलावर खर्च करून त्याची भरपाई करत असतो. पण मुल म्हणजे काय. त्याची वाढ कशी होते, त्याची बुद्धी कशी विकसित होते, मुल कसा विचार करते, मुल मोठ्यांच्या अनुकरणातून कसे शिकत असते, या प्रश्नांची उत्तरेच पालक शोधत नाहीत. किंबहूना असे प्रश्नच पालकांना पडत नाहीत वा त्यापासून पालकांना पळ काढायचा असतो, ही आजच्या मुलांची, पालकांची व शिक्षणाची समस्या बनली आहे. त्यात मग शिक्षणाचा धंदा मांडणर्‍यांनी आपले स्वार्थ साधून घेतले आहेत. त्याच्यावर सरकारपेक्षा सामान्य पालकच उत्तम उपाय योजू शकतो. पण त्यासाठी त्याने प्रचंड पैसे खर्च करण्याची गरज नसून मुलांवर आपला वेळ खर्च करण्याचे औदार्य दाखवले पाहिजे. मुल शिकते म्हणजे तरी काय करते? या प्रश्नाचे उत्तर उद्या शोधू.

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये

फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी भाषेचे महत्त्व कितीही असले तरी प्राथमिक शिक्षण हे मुलांच्या मातृभाषेतूनच झाले पाहिजे. फॅशन म्हणून पालकांनी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालू नये. कारण मातृभाषा हे हेच शिक्षणाचे स्वाभाविक माध्यम असून त्याच भाषेतून मुलांचा सर्वागीण विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. ज्ञाननिर्मितीसाठी इंग्रजी भाषेचा वापर होत असला तरी सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान व तंत्रज्ञान लोकभाषेतूनच प्रभावीपणे पोचविता येईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मराठी भाषा व संस्कृतीसाठी काम करू इच्छिणाऱ्या आजी-माजी विद्यार्थी शिक्षकांच्या या मेळाव्याला मुंबई, ठाणे, कर्जत, पालघर परिसरातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मौलिक योगदान देणाऱ्या डॉ. दत्ता पवार आणि मिलिंद चिंदरकर यांचा डॉ. काकोडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी संशोधन मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता पवार यांनी विद्यापिठीय अभ्यासक्रमात मराठी विषयाचे स्थान अबाधित राहावे म्हणून उभ्या राहिलेल्या भूतकाळातील आंदोलनांच्या यशापयशाचा आढावा यावेळी घेतला. तर महात्मा गांधी विद्या मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेचे संचालक मिलिंद चिंदरकर यांनी ‘गुरुकुल’ या मराठी माध्यमातील शाळेच्या अभिनव प्रयोगाची माहिती देत आनंददायी, अनुभवाधिष्ठित आणि मराठीतील शिक्षणातून मुलांचा सर्वागीण विकास होतो हे पालकांनी ओळखले पाहिजे हे आग्रहपूर्वक मांडले. तसेच ‘घोका आणि ओका’ यामधून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी खऱ्या ज्ञानाचा शोध घ्यावा, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. डॉ. अनिल काकोडकर